Saturday 6 June 2020

पावसाळा आणि पोटाचे आजार

पावसाळ्यात उलट्या, जुलाबांचे आजार वाढतात. हे केवळ मानवाच्या बेशिस्तीमुळे, बकालपणामुळे आणि अस्वच्छतेने पसरणारे आजार असतात. पावसाळ्यात जलाशयांमधील पाण्याची पातळी ढवळून निघते. हे अस्वच्छ गढूळ पाणी पिण्यात आल्यास उलट्या, जुलाब, मळमळ, आमांश असे रोग होतात. अनेकदा नळातून पिवळट पाणी येते. घराबाहेर पाणी पिताना अस्वच्छ जागी साठवणूक करण्यात येणारे पाणी प्यायल्यानेही असे त्रास होतात. खराब पाण्यात पोहताना पाणी तोंडातून जाऊन हे त्रास होतात.

ही काळजी घ्या : आपल्या घरात असे पाणी आल्यास ते गाळून, उकळून न वापरल्याने हे आजार होतात. गावा-शहरातील हॉटेल्स, खानावळी अन्नपाण्याच्या स्वच्छतेची काळजी घेतात, की नाही याची जबाबदारी तिथल्या स्थानिक प्रशासनाच्या आरोग्य विभागाची असते. त्यात हलगर्जीपणा झाल्यास आमांश आणि जिवाणूंनी होणाऱ्या उलट्या-जुलाबांची, गॅस्ट्रोची साथ पसरते.
काही वेळेस घराबाहेरचे अन्न खाण्यात आल्यानेही असे त्रास उद्भवतात. पावसाळा असो की कोणताही ऋतू असो. घरात स्वयंपाकापूर्वी भाजी मंडईतून आणलेल्या भाज्या स्वच्छ पाण्यात धुऊन घेणे गरजेचे असते. पावसाळ्यातल्या चिखलात भिजलेल्या भाज्यांमध्ये संसर्ग निर्माण करणारे जंतू, कीटकांची अंडी, असू शकतात. विशेषत: पालेभाज्या आणि फळे घेताना अनेकदा त्यात गांडुळेसुद्धा सापडतात. घरगुती स्वच्छतेची ही मूलभूत गोष्ट न पाळल्यास पोटाचे आजार होणारच.
पावसात भिजून त्वचा सतत ओली राहिल्यास बुरशीचा संसर्ग होतो. विशेषतः पावसात भिजल्यावर अंगावरील ओले कपडे न बदलता ते तसेच दिवसभर वापरले, तर हा त्रास हमखास होतो. धुतलेले कपडे पावसाळ्यात लवकर वाळत नाहीत. अशा स्थितीत न वाळलेली ओली अंतर्वस्त्रे वापरल्यास
जांघा, काखा यामध्ये अशी बुरशीजन्य किंवा फंगल इन्फेक्शन्स हमखास होतात. पायातील ओले मोजे, ओले बूट यामुळे किंवा सतत पावसाच्या साचलेल्या पाण्यात काम करावे लागल्याने पायांच्या बोटांत चिखल्या होतात. नखेसुद्धा बुरशीच्या संसर्गाने खराब होतात. केस ओले ठेवल्यास टाळूवर अशी बुरशीजन्य आजार उद्भवतात. म्हणजेच कोरडे अंग न ठेवल्याने, ओले कपडे वापरल्याने आजार होतात.

No comments:

Post a Comment