Tuesday 1 December 2020

पळवून लावेल करोना, जो खाईल बेदाणा


आयुर्वेदामध्ये बेदाण्याला महत्त्व आहेच. शरीराची रोजची झीज भरून काढण्यासाठी बेदाणा उपयुक्त तर आहेच, पण जिभेवर रेंगाळणारी चव देण्याची क्षमताही  बेदाण्यामध्ये आहे. च्यवनप्राशसारख्या आयुर्वेदिक औषधामध्ये बेदाण्याचा मूलभूत घटक म्हणून वापर करण्यात येतो. सुक्या मेव्यातील अन्य घटकापेक्षा बेदाणा स्वस्त असल्याने याचा भरपूर वापर यामध्ये करण्यात येतो. बेदाण्याचे आयुर्वेदात अनेक फायदे सांगितले आहेत. पोटॅशियम, लोह, कॅल्शियम यांची शारीरिक गरज बेदाणा पूर्ण करू शकतो. तसेच मूत्रपिंडाचे काम कार्यक्षम करण्यास उपयुक्त ठरतो असे आहारतज्ज्ञांचे मत आहे. दिवसभराच्या श्रमाने शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी २४ तासांत केवळ ३० ग्रॅम बेदाणा उपयुक्त ठरू शकतो. लहान मुलांना पौष्टिक आहार म्हणून बेदाण्याचा वापर उपयुक्त ठरू शकतो. याबाबत अंगणवाडीतील मुलाबरोबरच शालेय पोषण आहारात बेदाण्याचा समावेश होण्याची गरज आहे. दरवर्षी सव्वा ते दीड लाख टन बेदाणा उत्पादन होत असताना या वर्षी कोरोनामुळे हे उत्पादन दोन लाख टनांपर्यंत गेले. दिवाळीपर्यंत यापैकी दीड लाख टन बेदाणा विक्री झाली असून दरही प्रतवारीनुसार १०० रुपयांपासून २६५ रुपयांपर्यंत मिळाला. यंदाच्या हंगामातील आतापर्यंतची बेदाणा उलाढाल २ हजार कोटींच्या घरात गेली आहे. तासगावच्या बेदाण्याला दोन वर्षांपूर्वी भौगोलिक मानांकन मिळाले. याचाही फायदा यंदा उत्पादकांना झाला. भविष्यात बेदाण्याकडे वळलेला ग्राहक स्वस्तातील बुस्टर म्हणून बेदाण्याकडे कायमचा आकर्षति ठेवण्यासाठी आता प्रबोधन आणि प्रसार करण्याची गरज आहे. ‘संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे’ अशी जाहिरात करून पोल्ट्री उद्योगाने बस्तान बसवले तसेच ‘पळवून लावेल करोना, जो खाईल बेदाणा’ अशा स्वरूपाचे प्रचारकी वाक्य वापरून बाजारपेठेत बस्तान बसविणे अवघड नाही. करोना संकट नसून एक संधी म्हणून बेदाणा उत्पादकांनी याकडे पाहण्याची गरज आहे.

तासगाव, पंढरपूर आणि विजापूर ही बेदाणा निर्मितीची मुख्य केंद्रे आहेत. यापैकी तासगावचा बेदाणा हा अन्य ठिकाणच्या बेदाण्यापेक्षा सरस ठरतो. याचे कारण इथल्या माती, हवा आणि पाणी यामध्ये आहे. कोरडे आणि शुष्क हवामान, निचऱ्याची जमीन आणि प्रदूषणमुक्त पाणी हे मूलभूत घटक मुबलक असल्याने बेदाण्याचा दर्जा कायम ठेवण्यात येथील शेतकरी यशस्वी होतीलच, पण कष्टाळू शेतकरी प्रयोगशाळेतील संशोधनापेक्षा स्वत संशोधक असल्याने अनेक अडचणीवर मात करीत बेदाण्याचा उत्तम दर्जा राखण्यात यशस्वी ठरले आहेत. या परिसरात हिरवा आणि पिवळा अशा दोन पद्धतीचा बेदाणा तयार करण्यात येतो.  फळछाटणीनंतर किमान १२० दिवस झाल्यानंतर द्राक्ष मण्यामध्ये साखर निर्मिती होते. बेदाण्यासाठी खास तयार करण्यात आलेल्या द्राक्षामध्ये २२ ब्रिक्स आढळले, की माल बेदाण्यासाठी तयार झाल्याचे मानले जाते. द्राक्ष वेलीवरून काढल्यानंतर त्यातील पाण्याचा भाग लवकर निघून जावा यासाठी डिपिंग ऑइल आणि पोटॅशियम काब्रेनेटच्या द्रावणामध्ये बुडवले जाते. त्यानंतर सुकविण्यासाठी रॅकवर द्राक्षे पसरली जातात. जर तपमान ३० ते ३२ सेल्सियस असेल तर नवव्या दिवशी बेदाणा तयार होतो. जर पिवळा हवा असेल तर गंधकाची धुरी दिली जाते. ज्या बेदाण्यात गर आणि गोडी जास्त, चिकटपणा कमी एकसारखा गोल बेदाणा असेल तर तो उत्तम दर्जाचा बेदाणा मानला जातो. ज्या द्राक्ष मण्यामध्ये पाणी जादा असते गर कमी असतो, तो निम्न स्तराचा बेदाणा म्हणून प्रतवारी निश्चित करता येते. प्रतवारीनुसार बेदाण्याचे दर निश्चित होते.