Thursday 29 April 2021

खरबुजाचे आरोग्यदायी फायदे


खरबूज कलिंगडच्या जातीतले एक फळ आहे. खरबूज लंबगोल, अंडाकार आकाराचे आणि पिवळसर रंगाचे असते. खरबूज हे फळ वेल वर्गातील असून ,त्याच्या अनेक जातीही आहेत. फळांचा रंग, आकार, सालीच्या जाडी व चवीनुसार त्यांच्या जातीत बदल होतो. भारतामध्ये उष्ण हवामानाच्या प्रदेशात या फळाची लागवड केली जाते. खरबूज फळामध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म असतात. त्यामुळे हंगामात खरबुजाचे सेवन करणे फायदेशीर ठरते.

फळाच्या गरांमध्ये तंतुमय पदार्थ मोठ्या प्रमाणात असतात. फळांमधून जीवनसत्त्व ए, बी, सी, ई, के व खनिजे मुबलक प्रमाणात मिळतात. फळाच्या सालीमध्ये कॅरोटिनॉईड व फ्लॅवेनोईड ही जीवनसत्त्वे असतात. यातील जीवनसत्त्व अ डोळ्यांच्या आरोग्य राखण्यास फायदेशीर असते. तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी तसेच हृदयाचे स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी मदत करते.

खरबूज फळांमध्ये ९० ते ९५ टक्के पाणी असते. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये होणाऱ्या उष्णतेच्या विकारापासून बचाव करण्यासाठी खरबुजाचा ज्यूस उपयुक्त आहे. अतिसारामध्ये शरीरातील पाणी कमी होते. अशावेळी खरबुजाच्या सेवन केल्यास शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते. खरबूज फळाची साल किंवा बियांना व्यवस्थित बारीक केलेली पेस्ट चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावरील काळे डाग निघून जातात. डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे.

खरबुजापासून जाम, मिल्क शेक आईस्क्रीम, बर्फी बनवले जात आहेत. -मच्छिंद्र ऐनापुरे

Wednesday 28 April 2021

ड्रॅगन फ्रूटचे आरोग्यदायी फायदे


ड्रॅगन फ्रूटची शेती आपल्याकडे दुष्काळी भागात वाढत आहे. कमी पाण्यात तग धरून राहणारी ही वनस्पती चांगले उत्पन्न देत आहे. आकर्षक रंगाचे ड्रॅगन फ्रूट हे मूळचे मेक्सिको आणि अमेरिका या देशातील आहे. याचे फळ चांगले उत्पन्न देऊन शेतकऱ्याला त्याची आर्थिक उन्नती करण्यास हातभार लावत आहेच,पण हे फळ आरोग्य दृष्टीनेही मोठे लाभदायक आहे.  ड्रॅगन फ्रूटमध्ये प्रथिनांचे चांगले प्रमाण असते. शरीरातील कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी हे फळ फायदेशीर आहे. शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासोबतच पचनक्रिया  सुरळीत ठेवण्यासाठीही मदत होते. ड्रॅगन  फ्रूटच्या जातींमध्ये विविधता आढळते. यामध्ये पांढऱ्या रंगाचे गर असलेले लाल रंगाचे फळ, लाल रंगाचे गर असलेले लाल रंगाचे फळ आणि पांढऱ्या रंगाचे गर असलेले पिवळ्या रंगाचे फळ असे प्रकार दिसतात.ही फळे आता मोठ्या प्रमाणात बाजारात दिसू लागली आहेत.

या फळामध्ये भरपूर प्रमाणात 'क' जीवनसत्वाबरोबर कॅल्शिअम, पोटॅशिअम, लोह, आणि जीवनसत्त्व-ब तसेच 90 टक्के पाणी असते. अल्प प्रमाणात 'क' जीवनसत्त्व असल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. फळात भरपूर प्रमाणात तंतूमय घटक असल्याने पोट साफ होण्यास मदत होते. शरीरात रक्तपुरवठा नीट होऊन सर्व इंद्रिये व्यवस्थित काम करतात. त्यामुळे कोलेस्टेरॉल कमी होते, रक्तातील साखर कमी होते. कोलेस्टेरॉल कमी असल्याने हृदय विकाराचा धोका राहत नाही. यामध्ये बीटा कॅरोटीन असल्याने रक्तदाब, हृदय विकारावर मात करता येते.

ड्रॅगन फळामध्ये उपलब्ध असणारे पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स, ओमेगा-3 आणि ओमेगा-6 वाईट कोलेस्टेरॉलला वाढू देत नाही. यातील लोह रक्तातील हिमोग्लोबिन वाढवते आणि अॅनिमिया होऊ देत नाही. फळाचा आहारात समावेश असल्यास संधिवाताच्या वेदना कमी होतात. दात व हाडे मजबूत होतात. फळांचे सेवन केले तर रोगप्रतिकार शक्ती वाढते. फळांमधील लायकोपेन विकर आणि 'क' जीवनसत्त्व असते. फळाच्या सालीमध्ये पॉलीफेनॉल असते. चेहऱ्यावरचे फोड, रुक्ष केस, केस गळणे, उन्हाने काळवंडून गेलेल्या त्वचेवर हे फळ उपयोगाचे आहे.

ड्रॅगन फ्रूटपासून जॅम, जेली आणि सरबत करता येत असल्याने फ्रूट प्रक्रियेला संधी आहे. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


Wednesday 21 April 2021

फायदे नारळ पाणी पिण्याचे


• नारळ पाण्यामध्ये इलेट्रोलाईट, पोटॅशियम, लोह, मैंगनीज, जीवनसत्व क आणि फोलेट यासारखे पौष्टिक घटक असतात.

• नारळ पाण्यात नैसर्गिक साखर असते. त्यामुळे आपल्या शरीराच्या किंवा रक्ताच्या साखर पातळीवर त्याचा काहीही विपरीत परिणाम होत नाही.

• नारळ पाण्यामध्ये ९४ टक्के पाणी असते. त्यात चरबीचे प्रमाण खूप कमी आहे. २५० मिलि नारळाच्या पाण्यात कर्बाचे प्रमाण-९ ग्रॅम, तंतू-३ ग्रॅम, प्रथिने-२ ग्रॅम, जीवनसत्त्व क- १० टक्के, मॅग्नेशिअम-१७ टक्के, सोडियम- ११ टक्के, कॅल्शिअम- ६ टक्के असते. तसेच ते मानवाच्या शरिरात चांगल्या प्रकारे परिणामकारक ठरते.

• शरीरातील ग्लुकोजची पातळी चांगली ठेवली असल्यामुळे उन्हाळ्यात नारळ पाणी सेवन करणे चांगले असते.

• नारळ पाणी प्यायल्यामुळे पोटातील जळजळ, अल्सर, कोलायटिस, आतड्यांमधील जळजळ यांसारख्या पोटाच्या समस्येपासून आराम मिळतो. तसेच आपल्या शरीरास ऊर्जा देण्याचे कार्य करते. अशक्तपणा, थकवा, चक्कर येणे यांसारख्या समस्यांतून सुटका होते.

• नारळाच्या पाण्यात जीवनसत्त्व सी, मॅग्नेशिअम आणि पोटॅशियम यासारखे पोषक गुणधर्म मुबलक प्रमाणात असल्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.

• फेसपॅक म्हणून देखील याचा वापर केला जातो.

• उन्हाळ्यात टॅनिंग काढून टाकण्यासाठी नारळाच्या पाण्याने आपला चेहरा धुतल्यामुळे टॅनिंग कमी होते, चेहरा थंड राहतो.

• नारळ पाणी पिण्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यामुळे संसर्गजन्य रोगांचा धोका कमी होतो. (अनिकेत फिचर्स)


Tuesday 20 April 2021

दीर्घ श्वसनाचे फायदे


व्यायाम हा तणावमुक्तीसाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे नियमित व्यायामाचा फायदा मानसिक आरोग्यासाठीही होतोच. व्यायामातील दीर्घ श्‍वसनाचाही तणावमुक्तीसाठी फायदा होतो. रोज काही मिनिटे दीर्घ श्‍वसन केल्यास तणाव दूर होण्यास मदत होते. मन आणि शरीरालाही आराम मिळतो. त्यामुळेच झोपही चांगली लागते. श्‍वसन योग्य प्रकारे होणेही महत्त्वाचे आहे. श्‍वसन आणि आरोग्य यांचा द.ृढ संबंध असल्याने योग्य प्रकारे श्‍वसन होणे, हे शरीराच्या आरोग्याच्या द.ृष्टीने महत्त्वाचे आहे. दीर्घश्‍वसनाचे अनेक फायदे होतातच. दीर्घ श्‍वसन योग्य प्रकारे कसे केले पाहिजे आणि त्याचे काय फायदे होतात ते जाणून घेऊया.

दीर्घ श्‍वसन कसे करावे?

आराम किंवा सुखासनात बसावे अथवा झोपावे. नाकाने हळूहळू श्‍वास घेण्यास सुरुवात करावी. पोट हवेने भरले पाहिजे. नाकाने हळूहळू श्‍वास बाहेर सोडावा. ही क्रिया करताना एक हात पोटावर आणि दुसरा हात छातीवर ठेवावा. हळूहळू श्‍वास घेताना पोटात हवा भरली जाण्याची क्रिया जाणवू द्या. तसेच श्‍वास सोडताना पोट खाली जाते, त्याचीही जाणीव झाली पाहिजे. जेव्हा आपण श्‍वास घेतो तेव्हा पोटावरील हात हा छातीवरील हाताच्या तुलनेत अधिक वर येतो.

फायदे कोणते?

चुकीच्या पद्धतीने बसल्यास श्‍वासही चुकीच्या पद्धतीने घेतला जातो. जेव्हा आपण दीर्घ श्‍वास घेण्याची क्रिया करतो, तेव्हा शरीर आपोआपच मणकाही ताठ करू लागते. दीर्घ श्‍वसन केल्याने एंडोमॉर्फिन मुक्त होते. एंडोमॉर्फिन चांगले हार्मोन असते. शरीरातील नैसर्गिक वेदनाशामक म्हणून ते काम करते.

दीर्घ श्‍वसन करतो तेव्हा छातीचा भाता वरखाली होतो. त्यामुळे रक्ताभिसरणाला ते प्रोत्साहन देत शरीरातील विषारी घटक काढून टाकण्यास मदत करते. रक्ताभिसरण वाढल्यामुळे व्यक्तीच्या रक्तामध्ये जास्त ऑक्सिजनचा पुरवठा होतो. ऑक्सिजन वाढल्याने ऊर्जेच्या पातळीतही वाढ होते. दीर्घ श्‍वसन केल्याने शरीरातील आम्लता कमी होते. तणावामुळे शरीरातील आम्लाच्या प्रमाणातही वाढ होते. श्‍वास घेतल्याने तणावही कमी होतो. त्यामुळे पित्तप्रकोप होण्याचे प्रमाणही कमी होते. कार्बन डायऑक्साईड हे नैसर्गिक विषारी टाकाऊ घटक असतात. श्‍वासातून हे विषारी घटक शरीराबाहेर टाकले जातात. याखेरीज दीर्घ श्‍वसनामुळे पचनतंत्रासह शरीरातील सर्वच अवयवांना जास्त ऑक्सिजनचा पुरवठा होतो. त्यामुळे शरीरातील अवयवांचे कार्य चांगल्या प्रकारे होते. एखाद्या व्यक्तीला जेव्हा खूप राग येतो, तो थकलेला असतो किंवा घाबरलेला असतो तेव्हा त्याचे स्नायू कडक होतात आणि वरवर अपुरा श्‍वास घेतला जातो. काही वेळा श्‍वास थांबतो. त्यामुळे शरीराला आवश्यक तेवढा ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात मिळत नाही. दीर्घ श्‍वसन केल्यास ही सर्व प्रक्रिया उलट करून शरीर आणि मन शांत करण्यास मदत होते. नियमित व्यायामामध्ये दीर्घ श्‍वसनाचा समावेश केल्यास शरीर आणि मन दोन्हीही तंदुरुस्त राहण्यास मदतच होते.

शेवग्याचे सेवन आरोग्याला हितकारक


आपल्या खाद्यसंस्कृतीत शेवग्याला विशिष्ट असे स्थान आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीला शेवग्याच्या पानांची भाजी आवर्जून केली जाते. शेवग्याच्या फुलांची भाजी, शेवग्याच्या शेंगांची भाजी, शेवग्याच्या शेंगांचे सार, शेंगा, फ्राय, लोणचे तयार करता येते. ओरिसामध्ये शेवग्याच्या शेंगा वापरून छुई आळू पोटळं भजा ही परतलेली कोरडी भाजी बनविली जाते. उडप्यांच्या हॉटेलातील सांबारात शेवग्याच्या शेंगेला विशिष्ट स्थान आहे.. शेवगा गरम, हलका, मधुर, तिखट, अग्निप्रदीपक, रुचकर, दाहकारक, वीर्यवर्धक, पित्त वरक्त प्रकोपक असून, शेवग्याची भाजी वातविकार दूर करणारी आहे. शेवग्याच्या मुळांचा रस काढून किंवा त्याच्या काढ्यात मध घालून घेतल्याने गळू बरे होतात. शेवग्याच्या खोडातून एक भुया रंगाचा डिंक मिळतो. तसेच बियांमधून रंगरहित तेल मिळते. तसेच मोठया प्रमाणात खनिजे आढळतात. शेवग्यापासून जीवनसत्त्व अ, क तसेच ई तयार करतात. पाणी शुद्धीकरणात शेवग्याच्या बियांचा वापर होतो. शेवग्याच्या पानांचा रस प्यायल्याने उचकी थांबते व धाप लागणे कमी होते. शेवग्याच्या पानांच्या रसात चमचाभर साखर घेऊन तो तीन दिवस प्यायल्याने वायूने आलेला गोळा नाहीसा होतो. शेवग्याच्या पानांच्या रसाने डोके चोळले असता डोक्यातील कोंडा निघून जातो.

मस्तकशूळ झाला असल्यास शेवग्याच्या पानांच्या रसात मिरे वाटून त्याचा लेप लावावा. पोट फुगले असल्यास शेवग्याच्या पानांच्या रसाचा काढा तयार करून त्यात हिंग व सुंठ घालून तो प्यावा. वाळलेल्या शेवग्याच्या शेंगांचं चूर्ण पाणी निर्जंतुक करण्यासाठी वापरलं जातं. तोंड येण्याची समस्या सतावत असलेल्यांनी याच्या पानांचा आहारात समावेश करावा. यात कॅल्शिअम, लोह आणि इतर जीवनसत्त्वांचा भरपूर प्रमाणात साठा असतो. त्यामुळे हाडांची मजबुती राखण्यास मदत होते. शेवग्याचा रस नियमित आहारात घेतल्यास हाडं मजबूत होतात.

रक्तशुद्धीकरण होऊन त्वचेच्या समस्या कमी होण्यास मदत होते. रक्तातील साखरेची पातळी कमी करत असल्याने मधुमेही रुग्णांनी शेवग्याचं सेवन करणं आवश्यक आहे. घसा खवखवणे, घसा सुजणे किंवा सर्दी झालेल्या लोकांनी या भाजीचं सूप प्यावं म्हणजे लवकर आराम पडतो. अस्थमा, ब्राँकायटिस आणि क्षयरोग असलेल्या लोकांनी ही भाजी खावी, म्हणजे त्रास कमी होतो. गरोदर महिलांनी या भाजीचं आवर्जून सेवन करावं, जेणेकरून प्रसुतीपूर्व आणि नंतर होणारे त्रास कमी होतात. तसंच प्रसूतीनंतर मातेला स्तनपानासाठी आवश्यक असणारं दूध शेवग्याच्या सेवनाने वाढतं आणि गर्भाशयाला आलेलं जडत्व कमी होण्यास मदत होते. मासिक पाळी अनियमित असलेल्यांनी शेंगाचा ज्युस २१ दिवस प्यायल्याने पाळी नियमित होते. तसंच पाळीदरम्यानची पोटदुखीही थांबते. शेवगा अँटिबॅक्टेरिअल म्हणूनही काम करतो. त्यामुळे संसर्ग होण्याचा संभव कमी असतो. उत्तम पाचक म्हणून कार्य करते. बद्धकोष्ठतेचा त्रास उद्भवत नाही. नियमित सेवनाने त्वचेचा पोतही सुधारतो.


Monday 12 April 2021

अशी घ्या उन्हाळ्यात पोटाची काळजी


सध्या उकाडा प्रचंड वाढत चालला आहे. उन्हामुळे सर्वांनाच त्रास होतोय. त्यामुळेच अनेकांना आरोग्याच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत. उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या समस्यांमध्ये पोटाचे विकार सर्वाधिक दिसून येतात. बहुतांश लोक उन्हाळ्यात पोटदुखीच्या त्रासानं हैराण झालेले असतात. अशा वेळी उन्हाळ्यातील दिवसात पोटाशी संबंधित नेमके कोणकोणते त्रास होतात आणि त्याचा प्रतिबंध व उपचार कसा करावा, याबद्दल अधिक जाणून घेऊ या. उन्हाळा म्हणजे उकाडा. घाम, चिकटपणा आणि त्यासोबत येणारे वेगवेगळे आजार. सर्दी, खोकला आणि तापानंतर या दिवसांत सगळ्यात जास्त त्रास देतं ते म्हणजे पोट. उन्हाळ्याच्या काळावधीत उच्च तापमान व्यक्तीच्या मनावरच नव्हे तर शरीरावरही परिणाम करतं. उष्णतेमुळे व्यक्तीची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होत जाते. त्यामुळे पोटासंबंधी विकार उद्भवू लागतात. पोटाचे आजार म्हणजेच पचनसंस्थेचे आजार. ते उन्हाळ्याच्या दिवसांत अधिक बळावतात. उन्हामुळे प्रचंड घाम येऊन शरीरातील पाणी निघून जात असल्यानं अनेकदा पोटविकार होतात. याशिवाय अस्वच्छ अन्न आणि दुषित पाण्यामुळे ही समस्या उद्भवते. याव्यतिरिक्त ताप येणं, वेदना जाणवणं, थकवा, अशक्तपणा, पोटदुखी आणि अगदी डोकेदुखीच्या तक्रारीही उन्हाळ्याच्या काळात दिसून येतात. उलट्या होणं, त्वचेवर लाल पुरळ उठणं,अॅसिडिटी, छातीत जळजळ होणं, चक्कर येणं, अशक्तपणा, महिलांमध्ये युरीन इन्फेक्शन, डायरिया  आणि ताप यासारख्या समस्याही उन्हाळ्यात आढळून येतात. उन्हाळ्यात अपचनाची समस्या टाळण्यासाठी कशी काळजी घ्यावी?

• पौष्टिक आहाराचं सेवन करा. फायबरयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा.

• ताजी फळं, भाज्या, डाळी, सोयाबीन आणि शेंगदाणे खावेत.

•टोमॅटो, सफरचंद्र, नाशपती, टरबूज, काकडी, गोड बटाटे आणि अननस आहारात असू द्या.

• उष्णतेमुळे घामावाटे शरीरातील पाणी निघून जातं. म्हणून जास्तीत जास्त पाणी प्यावं. पाणी न प्यायल्यानं अतिसाराची समस्या उद्भवू शकते.

• मसालेदार, तळलेले आणि जंकफूडचे सेवन करणं टाळावं. यामुळे पोटात जळजळ होऊ शकते.

•पिझ्झा, चिप्स आणि बेकरी पदार्थ खाऊ नयेत.

• आतड्यामध्ये असणारे बॅक्टेरियासाठी प्रोबायोटिक्स अतिशय उपयुक्त ठरू शकतात.

• रस्त्याच्या बाजूला उघड्यावर असलेलं अन्न खाणं टाळा आणि शिळं अन्न खाऊ नका. कारण यामुळे विषबाधा होऊ शकते.

•दररोज व्यायाम करा. योग, पोहणे, सायकलिंग, धावणं आणि एरोबिक्स देखील करु शकता.

•नियमितपणे व्यायाम केल्यास आरोग्य सुदृढ राखण्यास मदत होते. शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढवून विविध आजारांना दूर ठेवता येऊ शकतं.